कधी न झोपणारं शहर अशी मुंबईची ओळख आहे, पण तुम्हाला माहीत आहे का, 8-तासभराच्या प्रवासाने तुम्हाला शहरातली धावपळ आणि वेड लावणाऱ्या ट्रॅफिकपासून दूर एखाद्या निसर्गरम्य, थंड हवेच्या ठिकाणी जाता येतं.
खोपोली
दक्षिण मुंबईपासून ८० किलोमीटरवर असलेले खोपोली हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ (मुंबई- पुणे- बेंगळुरू महामार्ग) वरील सह्याद्री पर्वतरांगांमधअये वसलेले औद्योगिक शहर आहे. या ठिकाणी वर्षभरात केव्हाही जाता येत असले, तरी भर पावसाळ्यात खोपोलीला जाण्याची मजा काही और असते. तेव्हा हे ठिकाण पाऊस आणि धुक्याने वेढलेले असते. इथली पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणे पुढीलप्रमाणे –
झेनिथ धबधबा:हा २५ फुटी धबधबा, रॉक क्लायम्बिंग आणि रॅपलिंगसाठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.
कालोटे तलाव:हा निसर्गरम्य, शांत आणि पर्वतरांगानी वेढलेला तलाव आहे, जिथे आपला मित्रपरिवार आणि कुटुंबाबरोबर निवांत वेळ घालवता येतो. पावसाळ्यात इथून एक किलोमीटर अंतरावर कालोटे धबधबा पाहायला मिळतो.
अष्टविनायक मंदिरे: अध्यात्माची आवड असणाऱ्यांना इथे अष्टविनायकांपैकी दोन गणपती मंदिरांना – वरद विनायक महड आणि बल्लाळेश्वरला भेट देता येते.
इमॅजिका –येथे इमॅजिका हे तीनशे एकरांवर वसलेले जागतिक दर्जाचे थीम पार्क आहे. इथल्या वॉटर पार्कमध्ये विविध प्रकारच्या राइड्सचा आनंद घेता येतो. त्याशिवाय इथे स्नो पार्कही आहे.
कामशेत
मुंबईपासून शंभर किलोमीटर अंतरावर पश्चिम घाटांत वसलेले कामशेत हे गावाकडची आठवण करून देणारे थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणाला भेट देण्यासाठीऑक्टोबर ते मार्च हा काळ सर्वोत्तम असतो. फुलांची भरपूर झाडे, शांत तलाव आणि टेकड्या यामुळे हे ठिकाण निवांत वेळ घालवून स्वतःला ताजंतवानं करण्यासाठी सर्वोत्तम आहे. कामशेतमध्ये पुढील गोष्टी करता येतात.
पॅराग्लायडिंग – या ठिकाणाचा भारतातील आघाडीच्या दहा साहसी ठिकाणांमध्ये समावेश होतो व ते पॅराग्लायडिंगसाटी जास्त प्रसिद्ध आहे. पवना तलावावरून भरारी घेत कामशेतचा विहंगम दृश्य पाहाणं हा थरारक व सुखद अनुभव असतो. ऑक्टोबर ते मे हा काळ पॅराग्लायडिंगसाठी सर्वोत्तम असतो.
वडिवळी तलाव –या परिसरातला सर्वात मोठा कृत्रिम तलाव आहे, जिथे मासेमारी करता येते, पोहता येतं किंवा बोटीतून शांत- निवांत चक्कर मारता येते. तेवढंही खूप वाटत असेल, तर तळ्याकाठी बसून तिथल्या दृश्याचा आनंद घेता येतो.
ढाक बहिरी किल्ला –रायगड जिल्ह्यातला हा किल्ला ठाकूर आदिवासींच्या भैरी किल्ल्याला वाहिलेला आहे. जुन्या काळी आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. किल्ल्यावर पाण्याचे पाच- सहा टाके आणि पाण्याच्या दोन टाक्या असलेली गुहासुद्धा आहे. या गुहेमध्ये भांडी ठेवण्यात आली असून ही भांडी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्याला भैरी देव शिक्षा देतो अशी स्थानिकांची समजूत आहे. २७०० फूट उंचीच्या या किल्ल्यावर ट्रेकिंग करणं सोपं नसून मार्गावर मोठमोठे दगड आहे. किल्ल्याच्या शिखरावरून राजमाची, ड्यूक्स नोज, माणिकगड, कर्नाळा, भीमाशंकर आणि विसापूर अशी प्रसिद्ध ठिकाणे पाहाता येतात.
कसे पोहोचाल
जवळचे रेल्वे स्थानक लोणावळा आहे (खोपोलीपासून आठ किमी आणि कामशेतपासून १६ किमी)